“लोकांच्या मनातील सर्व शंकांना बालभारतीकडे समाधानकारक उत्तरे नसल्यास त्याचा अर्थ असा होईल की बालभारतीने त्यांच्या निर्णयापूर्वी पुरेशी तयारी न करता घाईने निर्णय घेतला आहे. बालभारतीने लक्षात घ्यायला हवे की भाषेतील संख्यानामवाचक शब्द बदलणे हा मुद्दा केवळ बालभारतीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील गणिताचे धडे आणि शालेय गणिताची परीक्षा एवढ्याशीच संबंधित नाही. तो मुद्दा मराठी समाजाच्या पुढील सर्व पिढ्यांच्या भाषेशी आणि जीवनव्यवहाराशी संबंधित आहे. त्यामुळे मुख्यतः भाषेशी संबंधित असलेला हा निर्णय बालभारतीने पुरेशा भाषाशास्त्रीय पुराव्याशिवाय आणि प्रयोगाधारित पाहणीशिवाय, केवळ काही गणिततज्ज्ञांच्या सल्ल्यावरून घेणे चुकीचे आहे. तेव्हा बालभारतीने सध्या हा निर्णय रद्द करून त्याविषयी पुन्हा विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत, तसेच व्यवस्थित संशोधन, प्रयोग व पाहणी करावी आणि त्या संबंधातील सर्व माहिती जनतेपुढे सादर करून त्याबद्दलच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात आणि जनतेच्या शंकांचे समाधान करावे. त्यानंतर जनतेचे मत अनुकूल असल्यास बालभारतीने शासनाची अनुमती घेऊन मग संख्यानामांत बदल करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही.”
♦ ♦ ♦
बालभारतीपुरस्कृत अभिनव(?) मराठी संख्यावाचनपद्धतीबद्दल काही शंका (संस्करण २.०)
– ले० सलील कुळकर्णी
१. प्रास्ताविक
बालभारतीने (‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ’ ह्यांनी) मराठी माध्यमाच्या शालेय गणिताच्या पाठ्यपुस्तकांत विशिष्ट संख्यांची रूढ नामे बदलून नवीन प्रकारची संख्यावाचनपद्धती रूढ करण्याची योजना केलेली आहे. त्याबद्दल हल्ली मोठ्या प्रमाणात चर्चेचे वादळ सुरू झाले. महाराष्ट्रातील सर्व पूर्ण-मराठी माध्यमाच्या आणि अर्ध-मराठी (सेमी-इंग्लिश?) माध्यमाच्या शाळांत बालभारतीची पुस्तकेच वापरली जात असल्यामुळे बालभारतीच्या धोरणांचा चालू आणि भावी पिढ्यांतील मराठी मुलांच्या शिक्षणावर आणि एकंदरीतच मराठीभाषक समाजावर फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे हा विषय फारच महत्त्वाचा आहे, काही दिवस चावून-चघळून मग विसरून जाण्यासारखा नाही, असे मला वाटते. त्यासाठी शंकासुराची भूमिका घेऊन ह्या नवीन संख्यावाचनपद्धतीच्या विविध पैलूंविषयी विविध माध्यमांमधून ज्या काही मुलाखती, लेख आणि चर्चा माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात आल्या, त्यांवर विचार केल्यावर जे काही साधकबाधक मुद्दे आणि शंका माझ्या मनात आल्या, त्या सर्व समाजातील शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, शिक्षकवर्ग आणि एकूणच सर्व बालक व पालकांच्या विचारार्थ सविस्तरपणे मांडाव्या असे मला वाटले, म्हणून ह्या लेखाचा प्रपंच मांडला. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा यथायोग्य आणि सर्वांगीण अभ्यास बालभारतीने केलेला असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या लेखात मी नोंदलेल्या माझ्या सर्व शंकांची समाधानकारक उत्तरे बालभारतीकडे तयार असतील अशी अपेक्षा आहे. बालभारतीने आपला प्रतिसाद सर्व मराठी जनतेच्या माहितीसाठी कृपया ताबडतोब जाहीर करावा, अशी मी विनंती करतो. तसेच महाराष्ट्रातील इतर विचारवंत मंडळीही ह्या विषयी आपली मते मांडतील, अशी मी अपेक्षा बाळगतो.
नम्र निवेदन : (१) प्रस्तावित संख्यानामांच्या बदलांच्या संबंधातील विविध मुद्द्यांचा सांगोपांग विचार करून नवीन संख्यावाचनपद्धतीच्या संबंधात माझ्या मनात उद्भवलेल्या शंका आणि त्याविषयी मला कराव्याशा वाटलेल्या सूचना ह्यांचे सविस्तर विवेचन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा लेख बराच लांबला आहे. त्या प्रश्नाच्या अनेक पैलूंचा विचार केल्यामुळे लेख थोडा विस्कळीतही झाला असेल. काही मुद्द्यांची वेगळ्या संदर्भात पुनरावृत्तीही झाली असेल. पण तरीही वाचकांनी हा लेख पूर्णपणे वाचून मगच त्याबद्दल आपली मते निश्चित करावीत, अशी विनंती. (२) बालभारतीच्या वतीने मुख्यतः गणिततज्ज्ञ डॉ० मंगला नारळीकरांनीच लेख लिहून आणि मुलाखती देऊन जोरकसपणे मराठी भाषेतील नियोजित संख्यावाचक शब्दांच्या बदलांचे समर्थन केले. त्यांच्या प्रतिपादनातील मला खटकलेल्या काही विधानांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न ह्या लेखात केलेला आहे. परंतु ही त्यांच्यावर व्यक्तिशः केलेली टीका आहे, असे कृपया कोणी मानू नये. गणितशास्त्रातील त्यांच्या विद्वत्तेबद्दल मी कुठल्याही प्रकारे शंका घेतलेली नसून, संख्यानामांच्या संज्ञांकडे गणितशास्त्राव्यतिरिक्त इतर दृष्टिकोनांतून, विशेषतः व्यावहारिक अंगाने पाहून प्रस्तुत बदलांच्या विषयी मी चर्चा केली आहे. (३) काही महत्त्वाची वाक्ये लक्षवेधी करण्यासाठी तपकिरी-लाल रंगात लिहिली आहेत, तर विशेषेकरून बालभारतीला उद्देशून असलेल्या शंका, विधाने आणि सूचना [चौकटी कंसात भडक निळ्या रंगात] लिहिल्या आहेत आणि त्यांना संदर्भासाठी क्रमांक दिलेले आहेत. बालभारतीने त्या त्या मुद्याच्या संबंधित विषयाच्या तज्ज्ञाशी (केवळ गणिततज्ज्ञच नव्हे) सल्लामसलत करून आणि त्यासंबंधात योग्य ती प्रत्यक्ष पाहणी (सर्वेक्षण) करून, त्या शंका, विधाने आणि सूचना ह्यांच्याबद्दल सविस्तर आणि समाधानकारक स्पष्टीकरण, महाराष्ट्रीय जनतेपुढे मांडावीत.
२. बालभारतीची योजना राज्यशासनाचा निर्णय धुडकावून लावणारी?
बालभारतीने योजलेल्या नवीन संख्यावाचनपद्धतीच्या संबंधात काही अगदी मूलभूत कायदेशीर प्रश्न उद्भवतात. महाराष्ट्र शासनाने दि० ६ नोव्हेंबर २००९ ह्या दिवशी लागू केलेल्या शासननिर्णयाच्या (जी०आर०) परिशिष्ट-५मध्ये (‘देवनागरी अंक आणि त्यांचे प्रमाणीकृत अक्षरी लेखन’) मराठीतील प्रमाणीकृत संख्यानामे नेमून दिलेली आहेत. राज्यशासनाचा हा शासननिर्णय शासकीय विभाग असलेल्या बालभारतीला नक्कीच लागू आहे. मग शासननिर्णयाद्वारे ठरवलेल्या संख्यानामांमध्ये बदल करण्यासाठी बालभारतीने राज्यशासनाची अनुमती मागितली होती काय? अनुमतीसाठी दिलेल्या विनंतीपत्रात बा०भा०ने त्यांच्या निष्कर्षाला आधारभूत असणारी सर्वेक्षणे, ह्या बदलांसाठी आधारभूत असणारे भाषाशास्त्रातील किंवा अन्य शास्त्रांतील नियमांचे संदर्भ, बा०भा०च्या तज्ज्ञांच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या आदर्श (इंग्रजी, कानडी इत्यादी) भाषांच्या माध्यमातून गणिताचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला गणितात प्रावीण्य मिळवण्याच्या बाबतीत इतर भाषिकांपेक्षा होणार्या विशेष फायद्यांचे किंवा त्यांनी मिळवलेल्या विशेष पारितोषिकांचे पुरावे, इत्यादी कुठले कुठले वैज्ञानिक पुरावे सादर केलेले होते? बा०भा०ची विनंती मान्य करून राज्यशासनाने बा०भा०ला आधीच्या प्रमाणीकृत संख्यालेखनपद्धतीमध्ये बदल करण्याची अनुमती दिली होती काय? तशी अनुमती दिल्यावर शासनाने नवीन शासननिर्णय जारी करून आधीच्या शासननिर्णयातील संख्यालेखनामध्ये बदल केल्याचे जाहीर केले होते काय? [जर वरील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नसेल तर बा०भा०ने घेतलेला नवीन संख्यानामांबद्दलचा निर्णय अनधिकृत (unauthorised), बेकायदेशीर (illegal) आणि म्हणूनच परिणामशून्य व रद्दबातल (null and void) ठरत नाही काय? ह्या मूलभूत प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सर्वप्रथम बालभारतीने द्यायला हवे.] (२.१) बालभारतीतर्फे ह्या सर्व कायद्यासंबंधातील प्राथमिक स्वरूपाच्या शंकांचे निराकरण केले जावे. बालभारतीच्या संख्यानामे बदलण्याच्या योजनेच्या इतर पैलूंच्या योग्यायोग्यतेविषयी (merit) पुढे चर्चा केली आहे. […]
.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे. (लेख उतरवून घेऊन संपूर्ण लेख सावकाश आणि काळजीपूर्वक वाचावा आणि मगच आपले मत निश्चित करावे.)
Amrutmanthan_मराठी-संख्यावाचन_V2.0_191215
.
◊ ◊ ◊
लेखात चर्चिलेले मुद्दे खालीलप्रमाणे.
१. प्रास्ताविक
२. बालभारतीची योजना राज्यशासनाचा निर्णय धुडकावून लावणारी?
३. मराठी भाषेतीलच संख्यानामांमधील जोडाक्षरे जाचक?
४. केवळ मराठीतील संख्यानामे अनियमित?
५. मराठीतील संख्यावाचनपद्धती बदलण्याच्या निर्णयाला कुठलाही शास्त्रीय आधार दिसत नाही
६. संख्या चुकीची लिहिल्यामुळे बालवाडीतील मुलीला शिक्षा. जबाबदार कोण?
७. नवीन संख्यावाचनपद्धतीप्रमाणे पाढे
८. क्रमवाचक शब्द (Ordinal Numbers)
९. शिक्षणतज्ज्ञ प्रा० रमेश पानसे ह्यांचे प्रतिपादन
१०. बालभारतीचे शिक्षणाच्या सुलभीकरणाचे खूळ
११. जगातील कुठलीच मानवीभाषा १००% नियमबद्ध नाही
१२. केवळ मराठी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकातील संख्यानामांचेच काटे आणि खडे का बोचतात?
१३. संस्कृत व्याकरणाच्या बाबतीत इंग्रजीची नक्कल करून आणलेल्या संज्ञा शेवटी बदलाव्या लागल्या
१४. लहानगी मुले अनेक भाषा पटापट का शिकतात?
१५. शब्दांचे प्रतिमावाचन
१६. मुलांना गणित विषय का कठीण वाटतो?
१७. ज्ञानरचनावादावर आधारित असलेली प्रयोगसिद्ध शिक्षणपद्धती
१८. नवीन संख्यावाचनपद्धती लादली जाणार नाही?
१९. संख्यानामांच्या प्रश्नास राजकीय रंग?
२०. मराठी माणसाचा न्यूनगंड आणि बचावात्मक धोरण
२१. बालभारतीने गणिततज्ज्ञांच्या सल्ल्याने भाषाविषयक निर्णय घ्यावेत काय?
२२. व्यापक संशोधन आणि सर्वेक्षण करणे आवश्यक
२३. बालभारतीच्या प्रस्तावित योजनेच्या संबंधातील काही तांत्रिक प्रश्न
२४. गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण आवश्यक
२५. शालेय शिक्षणविषयक इतर अधिक महत्त्वाच्या आणि मूलभूत विषयांकडे बालभारतीचे दुर्लक्ष?
२६. थोडक्यात निष्कर्ष
….
ह्या लेखांसंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवाव्या.
लेख आवडल्यास अवश्य आपल्या समविचारी मित्रांनाही वाचायला द्या.
– अमृतमंथन गट
…
अमृतमंथन अनुदिनीवरील ‘मराठी भाषा आणि शालेय शिक्षण’ ह्या विषयावरील काही लेखांचे दुवे खालीलप्रमाणे :-
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –}} http://wp.me/pzBjo-w8
भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्यशासनाची शिक्षणविषयक कर्तव्ये (ले० सलील कुळकर्णी) –}} https://wp.me/pzBjo-ww
भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ० इरावती कर्वे) –}} https://wp.me/pzBjo-ou
जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर) –}} https://wp.me/pzBjo-zo
भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक) –}} https://wp.me/pzBjo-GQ
‘स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक : अनय जोगळेकर) –}} https://wp.me/pzBjo-kP
राज्य मराठीचे.. इंग्रजी शाळांचे (ले० डॉ० प्रकाश परब, दै० लोकसत्ता, २२ नोव्हें० २०१०) –}} https://wp.me/pzBjo-yx
आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख) –}} https://wp.me/pzBjo-Iv
विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी) –}} https://wp.me/pzBjo-Fs
शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर) –}} https://wp.me/pzBjo-kv
मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन) –}} https://wp.me/pzBjo-xA
हे शिक्षण आपलं आहे? (ले० प्रा० मनोहर राईलकर, दै० लोकसत्ता) –}} https://wp.me/pzBjo-O7
फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर –}} https://wp.me/pzBjo-JY
समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार) –}} https://wp.me/pzBjo-wD
इंग्रजी जरूर शिकू, मराठीला मारण्याची काय गरज? (दै० लोकमत मधील काही लेख) –}} https://wp.me/pzBjo-ok
तमिळ आणि मराठी शासनकर्त्यांची तुलना – स्वाभिमान, अस्मिता, जनहिताची कळकळ याबाबतीत –}} https://wp.me/pzBjo-t6
Study Tamil to get jobs: Karunanidhi (Sify News) –}} https://wp.me/pzBjo-pw
सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया) –}} https://wp.me/pzBjo-fZ
Blame it on RTE: Rural students cannot read (DNA, 17 Jan 2012) –}} https://wp.me/pzBjo-JQ
Namibia’s language policy is ‘poisoning’ its children (The Guardian, UK) –}} https://wp.me/pzBjo-JA
…..