क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)

विश्वरचनेच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञान आणि अध्यात्म आपल्या परीने लाखो वर्षे करीत आहेत. विज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञानात गेल्या दोन शतकात झालेल्या विस्मयकारक प्रगतीने साऱ्यांना केवळ थक्क करून सोडले आहे, असे नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याचा तो एकमेव मार्ग असल्याचा भ्रमदेखील निर्माण केला आहे. प्रयोगसिद्धता, सातत्य आणि सार्वकालिकता ही विज्ञानाची बलस्थाने होती. व्यक्तिगत अनुभूति आणि अनुभव ह्यांना त्यात स्थानच नव्हते. कारण त्यातून येणारे निष्कर्ष अवैज्ञानिक ठरवून ते नाकारण्याकडेच वैज्ञानिक जगताचा कल होता. पण, आता आपल्याच चाचण्या, कसोट्या, प्रयोग हे अंतिम सत्यापर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत याची जाणीव वैज्ञानिक जगतास झाली आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान तत्त्वज्ञानातून याचे किमान सूत्र तरी सापडेल अशा आशेने वैज्ञानिक जगत भारतीय ज्ञानमार्गाच्या अभ्यासाकडे वळले आहे. भारतीय असेल ते त्याज्य आणि पाश्चात्त्य असेल ते शुद्ध वैज्ञानिक अशा भ्रमातून बाहेर येऊन आपणदेखील भारतीय विचारदर्शन नव्यावैज्ञानिक प्रगतीस मार्गदर्शक कसे ठरेल ह्याचा विचार करायलाच हवा. भारतीय संशोधनासमोरचे हे खरे आव्हान आहे. ब्रह्म आणि जगत यांतील अद्वैताचा आता वैज्ञानिक अंगाने शोध घेतला जाणार आहे. जागतिक वैज्ञानिक संशोधनाच्या केंद्रस्थानी परतण्याची भारतीय संशोधकांना ही फार मोठी संधी आहे.

क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान

ले० आशिष कुलकर्णी

(किस्त्रीम दिवाळी अंक २००९ मधून साभार – पृष्ठ क्र० ४८-५४ आणि २०४ ते २०८)

लेखाच्या विषयाचे नाव ऐकल्यावर तथाकथित बुद्धिवाद्यांच्या भुवया उंचावतील ह्यात शंका नाही. पण वेदांना “वायफळाचे मळे” समजणाऱ्या (भारतीय) बुद्धिवाद्यांसाठी एक धक्कादायक गोष्ट आहे. ती म्हणजे २१व्या शतकातील विज्ञानात आणि अद्वैत वेदांतील इतका सारखेपणा आहे की, सध्याच्या विज्ञानाला त्याची दखल घ्यावीच लागत आहे. अर्थात, विज्ञान हे अध्यात्मात विलीन व्हायच्या मार्गावर आहे, हे म्हणणे बरोबर होणार नाही. पण विज्ञान आणि अध्यात्माची “एकत्रीकरण उपपत्ती” (युनिफिकेशन थिअरी)  मांडायची गरज भासू लागली आहे, हे निश्चित! एकोणिसाव्या शतकातील नियमांनी बांधलेले निश्चित असे जग होते, त्या जगात अनिश्चिततेला थारा नव्हता. विसाव्या शतकात हळू हळू हे जग अनिश्चिततेकडे झुकू लागले आणि आज एकविसाव्या शतकातील हे जग खुलं, सतत बदलणारं, सापेक्ष, अनिश्चित आणि अवकाश व वेळ यांच्याहीपेक्षा मूलभूत तत्त्वांनी बनलेले आहे. ह्या लेखाचा उद्देश ह्या नवीन बदलत्या जगाचा आणि कधीही न बदलणाऱ्या अद्वैत वेदांतातील तत्त्वज्ञानाचा किती जवळचा संबंध याची प्राथमिक माहिती देणे हा आहे.

सारांश

हा लेख लिहिण्यामागे, आजचे शास्त्र आणि वेदांचा किती जवळचा संबंध आहे, याची आपल्याला माहिती व्हावी हा उद्देश आहे. पाश्चात्त्य लोक वेदान्त किती गंभीरपणे घेत आहेत, हेही आपल्याला माहीत नसते. आपल्याच ज्ञानाकडे तुच्छतेने पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे. वेद म्हणजे केवळ काव्य, कल्पनाविलास असा दृढ समज आपल्याच तथाकथित बुद्धिवाद्यांनी करून दिला असल्याने आपली फारच मोठी हानी झाली आहे. विज्ञानात पाश्चात्त्यांची बरोबरी करणे आपल्याला शक्य नाही, याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे फक्त त्यांचे अनुकरण करणे इतकेच आपल्या हाती राहिले आहे. पण आपण जर आपल्या परंपरेत डोकावून पाहिले तर ज्ञानाचे अखंड, अविचल असे भांडार आपल्याला दिसते. आत्मा, ब्रह्मांड ह्या कल्पना पाश्चात्त्यांना समजणे फार अवघड जाते. पण आपल्याला त्या सहज समजतात. आपले गणिती ज्ञानसुद्धा अतिशय प्रगत आहे. त्यामुळे वेदांताच्या साह्याने जगाला विश्वाचे खरे रूप समजावून देण्याचे काम आपल्याला नक्कीच शक्य आहे. आपल्याच परंपरेचा उपयोग करून भारतीय शास्त्रज्ञ जगात सर्वोत्तम ठरू शकतात. एरवी ज्ञानसंपदा असूनसुद्धा त्याच्याकडे हेटाळणीच्या दृष्टीने पाहिल्यानेच आज जगात अभावानेच भारतीय शास्त्रज्ञाना नोबेल पारितोषिके मिळाली आहेत, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, ऐहिक सुखालाच सर्वोच्च मानण्याच्या पाश्चिमात्य देशांच्या पद्धतीमुळे निसर्गाची किती हानी होत आहे, हे आपण प्रतिदिन पाहात आहोत. अशा वेळी हजारो वर्षांत न बदलणारी वेदांची तत्त्वेच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतील, याची मला खात्री आहे. हवी आहे ती केवळ इच्छाशक्ती आणि आपल्या परंपरेला योग्य मान देण्याची. जर ह्या मार्गाने प्रयत्न झाले, तर पुढचे शतक भारतीय शास्त्रज्ञांचे असेल. आणि वेद जगाच्या उत्पत्ती विश्लेषणाच्या केंद्रस्थानी असतील, ह्याविषयी मला मुळीच शंका नाही. हे जर आपण केले नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. मग आहेच पाश्चात्त्यांची हुजरेगिरी करणे. आपला विचार आपणच करायचा आहे. हा लेख पाश्चिमात्य विज्ञानाला कमी लेखण्यासाठी लिहिला नाही. त्याच्याविषयी आदर हवाच. त्यांचे विज्ञानातील योगदान अमोल आहे. पण, नशिबाने आज भारतीय विज्ञानाला जगाच्या केंद्रस्थानी जायची सुवर्णसंधी आहे. ती आपण गमावू नये, अशी इच्छा आहे.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)

.

Tags: एकत्रीकरण उपपत्ती, Unification Theory, Isac Newton, आयझॅक न्यूटन, क्वांटम मेकॅनिक्स, क्वॉंटम मेकॅनिक्स, Quantum Mechanics, पुंजवाद, पुंजकणवाद, अल्बर्ट आइनस्टाइन, Albert Einstein, सापेक्षवाद, Relativity, E = mc2, नील्स बोहर, Niels Bohr, Upanjshads, उपनिषद, श्रॉडिंगर, Schrodinger, हायझेनबर्ग, हायसेनबर्ग, Heisenberg, अनिश्चितता-सूत्र, अनिश्चितता-तत्त्व, Uncertainty Principle, कोपेनहेगन, Copenhagen, वेदांत, वेदान्त, Vedanta, अद्वैत, Advaita, तत्त्वज्ञान, Philosophy, Atman, आत्मन्‌, Brahman, ब्रह्मन्‌, इनिक्वालिटी सिद्धांत, Inequality Principle, देवकण, God Particle, बोसॉन, Boson, सांख्य, Samkhya, अचिंत्य, Achintya, वेद, Veda, Vedas

.

2 thoughts on “क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)

  1. आशिष कुलकर्णी यांनी एक गूढ विषय छानदार मराठी वाचकांना समजून सांगितला. त्यांचे अभिनंदन. त्यांच्याशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांचा इ मेल आयडी आणि फोन कळाल्यास कृतज्ञ होऊ धन्यवाद-
    अण्णा सोनवणे
    नाशिक पंचवटी ९४२२७५६३३३.
    इमेल msonavane@hotmail.com

    • सप्रेम नमस्कार.

      किस्त्रीमच्या छापील अंकातील लेख आपल्या अमृतयात्री परिवारातील कोणी तरी मिळवून टंकित केला. पण आशिष कुलकर्णींच्या संपर्काचे तपशील मात्र मिळवावे लागतील. प्रयत्न करतो.

      स्वभाषा, स्वसंस्कृती आणि स्वदेश ह्यांच्याविषयीचे लेख आपल्याला अमृतमंथन (https://amrutmanthan.wordpress.com/) ह्या अनुदिनीवर सापडतील. सवडीने स्वैर फेरफटका मारा आणि आवडणारे लेख संपूर्ण वाचून पाहा.

      आपले घोषवाक्यच आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

      अमृतमंथनावरील लेख आवडल्यास ते समविचारी मित्रांनाही अग्रेषित करा. अमृतमंथनाचे सभासद व्हा.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.