’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’

कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली शाळाही सुरू झाली. आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ चालू आहे.

.

स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता. तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे स्थायिक झाली होती. पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही अत्यंत हौसेने व निष्ठेने जपलेले दिसते.

अमृतमंथन परिवारातील श्री० विजय पाध्ये यांनी सर्व अमृतयात्रींसाठी पाठवलेली ही दैनिक लोकसत्तेच्या २० फेब्रुवारी २०१०च्या अंकातील अत्यंत सुरस बातमी. नक्की वाचा.

’आमची’ कराची

उमेश करंदीकर

मुंबईत एका पक्षाच्या धाकानं एका दुकानमालकानं आपल्या दुकानाच्या नावातील ‘कराची’ हे नाव काढून टाकलं. पण आज जसं आपण तारस्वरात ‘आमची मुंबई’ म्हणतो तीच भावना कराचीबाबतही अनेकांची होती. फाळणीआधी कराचीत २५ हजार मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी, गुजराथी, मराठी लोकसंस्कृतीचा प्रभाव कराचीवर होता. फाळणीआघी कराची मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्टय़ा जोडलेले होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मुंबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रे’मध्येही कराचीतील वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे.

कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली शाळाही सुरू झाली. आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. फाळणीनंतर मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. सध्या कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सवही मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून गेली चार दशके धार्मिक विधी करणारे मोहन गायकवाड हे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्राला गायकवाड यांनी सांगितले की, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. या पूजेच्या निमित्ताने आपल्या लोकांना भेटता येते आणि खूप आनंद वाटतो, असे अनेकांनी सांगितले. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जनही केले जाते. आज कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.

कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्त्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्त्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात. माणूस आपला नांदता गाव मागे टाकतो तेव्हा त्याच्या उरात एक जखम भळभळत असते. त्या गावाची याद जागवत मग कुठे ‘कराची सोसायटी’ उभी राहते तर कुडाळसारख्या गावात ‘कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळ’ बहरते. दुरावलेल्या गावाचं नाव जपलं जातं ते भावविश्वाचा निखळलेला दुवा जपण्याची वेडी धडपड म्हणून. फाळणीनंतर भारतात परतलेल्या कराचीकरांच्या मनात आजही अस्फुट साद आहे ‘आमची कराची..’

—————–

परिशिष्ट-१:

आपले एक वाचकमित्र श्री० नितीन सावंत यांनी परिश्रमपूर्वक शोध घेऊन गूगल मॅप्सच्या ’नारायण जगन्नाथ हायस्कूल, कराची, पाकिस्तान’ हे ठिकाण दाखवणार्‍या नकाश्याचा खालील दुवा पाठवल्याबद्दल आम्ही सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने श्री० नितीन सावंतांचे आभार मानतो. आता प्रस्तुत नकाशा उघडून पाहून तशी शाळा खरोखरीच कराचीमध्ये असल्याची आपण खात्री करून घेऊ शकतो, मनोमन तिला भेट देऊ शकतो. त्यामुळे मराठी मनाला आनंद व अभिमान लाभेल.

http://maps.google.com/maps?hl=en&client=firefox-a&ie=UTF8&q=Narayan+Jagannath+High+School&fb=1&hq=narayan+highschool&hnear=Karachi,+Pakistan&cid=16180522888875221318&ei=TFG5TI6QOILIvQO36sy4DQ&ved=0CBMQnwIwAA&ll=24.862144,67.01883&spn=0.00118,0.002747&t=h&z=19&iwloc=A

सावंतांच्या कृतीपासून स्फूर्ती घेऊन आम्ही विकीपीडियावरील प्रकृत शाळेविषयीचा खालील दुवा शोधून काढला आहे.
.
.
पाकिस्तानातील मंडळींनी अभिमानाने प्रस्तुत लेख विकिपीडियावर चढवलेला दिसतो आहे. त्यात असे लिहिले आहे:
.

Narayan Jagannath High School

From Wikipedia, the free encyclopedia
The Narayan Jagannath High School at Karachi was the first government school established in Sindh. It was opened in October 1855 with 68 boys. The original buildings were replaced by the present ones in 1876.
In March 1916, the school had 477 students, of whom 350 were Hindus, 32 Brahmins, 10 Jains, 12 Muslims, 66 Parsis and seven Indian Jews.
Notable alumni include Jamshed Nusserwanjee Mehta, who was elected a councilor of Karachi in 1918, and the president of the Council in 1922. He became the first mayor of Karachi in 1933 when the Karachi Municipal Corporation was formed.
.

परिशिष्ट-२:

Pakistani Marathis celebrate Ganesh Pooja

स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता. तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे स्थायिक झाली होती. आजमितीला त्यापैकी फारच कमी (सुमारे २५०००) राहिली आहेत. पण पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही अत्यंत हौसेने व निष्ठेने जपलेले दिसते.

पाकिस्तानच्या ’paklinks.com’ या संकेतस्थळाच्या ’गपशप’ या सदरामधून.

I knew there was a large Marathi speaking population in Karachi as it was a part of the Bombay presidency. After partition many Marathi speakers, mainly Hindus, migrated to India. Though Marathi Muslims migrated to Pakistan, new generation has switched to Urdu. I dint knew that there still were quite a few Marathis in Pakistan.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

http://www.paklinks.com/gs/culture-literature-and-linguistics/295946-pakistan-marathis-celebrate-ganesh-pooja.html

.

अशाच प्रकारचा पाकिस्तानातील लाहोर शहरासंबंधातील एक लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा (ले० अंजली कीर्तने, लोकसत्ता)

.

44 thoughts on “’आमची’ कराची आणि तेथील ’नारायण जगन्नाथ हायस्कूल’ आणि ’गणेशोत्सव’

    • प्रिय श्री० नितीन सावंत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      गूगल मॅप्सच्या ’नारायण जगन्नाथ हायस्कूल, कराची, पाकिस्तान’ हे ठिकाण दाखवणार्‍या नकाश्याचा खालील दुवा पाठवल्याबद्दल खरोखरच आम्ही सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो. प्रस्तुत नकाशा उघडून पाहून तशी शाळा खरोखरीच कराचीमध्ये असल्याची आपण खात्री करून घेऊ शकतो. त्यामुळे मराठी मनाला आनंद व अभिमान लाभेल.

      http://maps.google.com/maps?hl=en&client=firefox-a&ie=UTF8&q=Narayan+Jagannath+High+School&fb=1&hq=narayan+highschool&hnear=Karachi,+Pakistan&cid=16180522888875221318&ei=TFG5TI6QOILIvQO36sy4DQ&ved=0CBMQnwIwAA&ll=24.862144,67.01883&spn=0.00118,0.002747&t=h&z=19&iwloc=A

      आपल्या कृतीपासून स्फूर्ती घेऊन आम्ही विकीपीडियावरील प्रकृत शाळेविषयीचा खालील दुवा शोधून काढला.

      http://en.wikipedia.org/wiki/Narayan_Jagannath_High_School

      ह्या दोन्ही गोष्टींचा मूळ लेखात अंतर्भाव करीत आहोत. ह्या महत्त्वाच्या माहितीबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय श्री० अरविंद गोविलकर यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाची प्रतिक्रिया आपल्याप्रमाणेच होईल. याच लेखाखालील श्री० यशवंत कर्णीक यांचे पत्रही अवश्य वाचा. आपल्याप्रमाणेच त्यांचाही आपुलकीने ऊर भरून आला. त्यांनी एक उत्तम सूचना केली आहे. तीबद्दल आपल्याला काय वाटते?

          क०लो०अ०

          अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली सूचना उत्तम आहे. आपण जर कराचीमधील मराठी मंडळींशी संपर्क प्रस्थापित करू शकलो, मराठी भाषा व संस्कृतीबद्दल विचारांची देवाणघेवाण करू शकलो, त्यांना कुठल्याही प्रकारे मदत पाहिजे असेल (पुस्तके, माहिती इत्यादी) तर ती देऊ शकलो तर फारच चांगले होईल. पण हे सर्व कसे साधायचे? त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? त्यांचा पत्ता (शक्यतो ईमेलचा पत्ता) कसा मिळवायचा व त्यानंतर काय करायचे?

      आपल्याला याबद्दल काय वाटते? नक्की कळवा. अमृतमंथन परिवारातील सर्वच मराठी मंडळींना ह्यात रस वाटेल. सर्वच वाचकांना आपण अशा उपक्रमाच्या विविध पैलूंबाबत सूचना करण्याचे आवाहन करूया.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  1. I think we have many people in ULLAHAS Nagar,who visit,or have visitors from Karachi,
    Our envoy in Maldives,Mr. Mule,who is also writer and known for networking Marathi,could help us by requesting INDIA HOUSE in that country,to providing the details,and legal path to contact them,
    as we need to be very careful in this regards,love for Marathi should not land Marathi lovers in problem,
    Mr.Karnik,no harm but nation first should be approch.

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली सूचना चांगली आहे. आपण श्री० मुळे ह्यांना ओळखता का? त्यांना अमृतमंथनाच्या वाचकांचे मनोगत कळवाल काय?

      वाट पाहतो. अत्यंत आभारी आहोत.

      आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी अमृतमंथन परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण घेत असलेल्या पुढाकाराबद्दल आभार. ह्यातून आपण कराचीमधील मराठी मंडळींशी संपर्क साधू शकलो, वेळोवेळी दळणवळण राखले, एकमेकाला यथाशक्य साहाय्य केले तर ती एक अत्यंत उत्तम गोष्ट होईल.

      आपल्या पुढील प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय डॉ० रूपाली मोकाशी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अनुदिनीवरील नारायण जगन्नाथ हायस्कूलबद्दलचा लेख पाहिला. उत्तम आहे. आमच्या ज्ञानातही भर पडली. सर्वच वाचकांनी तो पहावा अशी आग्रहाची विनंती करतो.

      आपल्या अमृतमंथन परिवाराचे काही सदस्य म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य आहे का?

      आपल्या अनुदिनीवरील इतर लेखही आवडले. त्यांना खास चमचमीत कायस्थी स्पर्श आहे. सोड्याचे कालवण जेवल्यावर (अर्थातच हाताने) साबण न लावता, फारसे न चोळता हात धुवायचे व नंतर कित्येक तास हाताचा सुगंध घेत कालवणाची रम्य आठवण काढीत पलंगावर ताणून द्यायचे, आयुष्यात यासारखी दुसरी चैन नाही, नाही का? (स्वानुभवावरून सांगतो.)

      असो. महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. Reply from diplomatic end was sad,no matter,I have asked my SINDHI FRIENDS to check things through their friends,some other options like letter to media over there,request to shipping company havin regular operations there,is also ready to check the things through their importers.
    but will take some time.
    Regards.

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण उत्स्फूर्तपणे करत असलेल्या चिवट प्रयत्नांबद्दल कौतुक वाटते. काही मार्ग निघाला तर ती एक मोठीच व महत्त्वाची गोष्ट ठरेल.

      सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने “आपल्या प्रयत्नांना ईश्वर यश देवो” अशी प्रामाणिक शुभेच्छा व्यक्त करतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. This year GANESHOTSAV was conducted at CLIFFTON SHIVA MANDIR,
    Mr gaikwaar is Pujari,
    only thing is it’s only for the day,
    then ARBEE SAMUDRAAT VISARJAN,
    IT’S TIME, MR. RAMDASI OF MAHARASHTRA SNEH SANWARDHINI,
    & BRIHAN MAHARASHTRA MANDAL TAKES SOME STEPS THROUGH MEA,
    to help us establish contacts with them officially,
    finally that’s the goal for them,
    even C.M. Maharashtra must do the needful,
    as contacts with that country are very tricky.
    Will get back to you soon

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      ही त्रोटक असली तरीही महत्त्वाची माहिती आहे. पाकिस्तानातील गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती, छायाचित्रे मिळू शकतील का?

      कराचीमधील मराठी माणसांचे एखादे मंडळ आहे का? त्यांचे संकेतस्थळ आहे का? तसे असल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधणे सोपे जावे. काहीतरी मार्ग शोधून काढला पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. What I came to know from some people in Gujrath,is HINDU’S have terror time,and Marathi’s do not mix up with others,but there are even ladies working as Managers in good firms,I am expecting further details through,INTACH U.K.
    but Maharashtra government must take lead and matter must surface at SAHITYA SAMMELAN.

    • प्रिय श्री० मायबोलीध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण विविध मार्गाने करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक वाटते.

      महाराष्ट्र राज्यशासनाकडून असले काहीही बिनफायद्याचे काम घडणे कठीण वाटते. पण शक्य असेल तर पहा.

      साहित्य संमेलनात हा मुद्दा चर्चेला आणण्याचा विचारही चांगला आहे. ते कसे करायचे?

      पाकिस्तानच्या भारतातील राजदूताच्या कार्यालयामधून काही माहिती मिळवणे शक्य आहे का?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्याबद्दल कौतुकादर वाटतो.

      हे १२०० मराठीभाषिक ज्यू म्हणजे महाराष्ट्रातील मूळचे बेणे इस्रायली का? ही संख्या केवळ कराचीमधील आहे की संपूर्ण पाकिस्तानातील?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण हे एक नवीन व्रतच हाती घेतलेले दिसते आहे. आपल्या प्रकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.

      अमृतमंथनावरील लाहोरविषयीचा खालील लेख वाचला का?

      हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा –} http://wp.me/pzBjo-zF

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. नमस्ते …माझे नाव रवींद्र हरि अभ्यंकर ….पुणे ….मी या माहितीत थोडी भर टाकू इच्छितो… कराची शहरात मागील शतकाच्या आरंभी सिंध प्रांतातील सक्कर धारणा बांधण्यासाठी बरेच पुणेकर रवाना झाले. हे लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने शाळा सुरु केली…अन्य खाजगी शाळा सुद्धा होत्या पण त्यांचे प्रमाण कमी होते. …सरकारी शाळेचे नाव “एन जे हायस्कूल” . ही शाळा “बंदर रोड” या प्रमुख रस्त्यावर होती. आता त्या रस्त्याचे नाव “महम्मद अलि जिना रस्ता” असे आहे. शंभरातील ऐंशी विद्यार्थी त्या शाळेचे विद्यार्थी असत. शाळेतील शिक्षक वर्ग सुद्धा मुंबई इलाख्यायाच्या शिक्षण विभागातील होते. तसेच मराठा समजातील बरीच मंडळी तेथे होती. काही नावे म्हणजे – कामत मास्तर, प्रधान मास्तर, प्रभावळकर मास्तर, अणावकर मास्तर इ. यातील प्रभावळकर मास्तर हे दिलीप प्रभावळकर यांचे आजोबा. ते गणित शिकवीत. कामत मास्तर संस्कृत व सायन्स शिकवीत. (प्रधान मास्तर यांचा विषय मला काही माहिती नाही पण स्नेहप्रभा प्रधान या त्यांच्या कुटुंबातील अशी ऐकीव माहिती आहे.) माझे आजोबा त्यांचे बी ए , एस टी सी शिक्षण पूर्ण करून त्या शाळेत १९१४ साली मास्तर म्हणून रुजू झाले. ते भूगोल शिकवीत आणि स्काउटमास्तर म्हणून सुद्धा काम पहात.
    या शाळेचे नाव ज्या अधिक-याच्या आठवणीसाठी दिले गेले ते एन जे = नारायण जगन्नाथ वैद्य नावाचे शिक्षणाधिकारी होते. ते म्हैसूर संस्थानात शिक्षणाधिकारी होते व नंतर त्याना सिंध प्रांतात सिंधी लिपीचा वाद मिटविण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांची माहिती मिळविणे आणि आज त्या एन जे हायस्कूल ची काय स्थिति आहे हे कुतूहल म्हणून माहिती करून घ्यायचे आहे. शिखांच्या सुवर्ण मंदिरातील कारवाई नंतर ज्यांची पुण्यात हत्या झाली ते जनरल अरुणकुमार वैद्य हे याच वैद्यांच्या घराण्यापैकी असे ऐकले आहे. पण त्याची पुष्टी कोठूनही होऊ शकली नाही.
    त्याकाळी तेथील महाराष्ट्रीय लोकांनी तेथे महाराष्ट्र मंडळ स्थापिले होते. त्याच्या वाटेने सर्व सार्वजनिक समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करीत. त्यात चैत्रागौरीचे हळदी कुंकू, गणपती उत्सव असे प्रमुख असत …
    दैनिक लोकसत्ता आणि केसरीचे माजी संपादक श्री अरविंद गोखले यांनी काही गोष्टींचा खुलासा केला …कारण ते तिकडे जाऊन आले होते व एन जे हायस्कूल मध्ये टिळकांचा पुतळा आहे हे त्यांचेकडून समजले. तसेच महम्मद अलि जिना हे टिळकांचे वकील होते आणि म्हणून तो पुतळा तेथे असावा असेही सांगितले. शिवाय शाळेच्या इमारतीत नारायण जगन्नाथ यांचे तैलचित्र सुद्धा आहे असे त्यानी सांगितले. ही शाळा मराठी माध्यमाची होती. त्या शाळेत गुजराती, पारशी, व मराठी अशा सर्व समाजातील मुले असत.

    आज शाळा आहे.. तिचे नावही तेच आहे. पण नारायण जगनाथ यांची माहिती मिळत नाही. त्याना सोपवलेल्या कामावरून ते भाषा तज्ञ असावेत (म्हणूनच त्यांना लिपी शुद्धीचे काम दिले असावे) असे वाटते. पण अन्य काहीही माहिती मिळत नाही.
    तर असे कामाचे स्वरूप आहे. किचकट आहे पण होऊ शकेल असे वाटते ….आत्तापर्यंत थोडी थोडी माहिती मिळाली तशी मिळेल असे वाटते.
    फाळणी नंतर भारत पाकिस्तान विभक्त झाले व् ही सर्व मंडळी आपापल्या गावी परतली. त्यातील काही मुंबईमध्ये स्थिरावली. त्यानी कुर्ला मुंबई येथे एक शिक्षण संस्थाही काढली …तिची नाव होते कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ..इतकी माहिती माझ्याजवळ आहे ..आणखी आपल्या मदतीने मिळवीन असा विश्वास आहे..

    • प्रिय श्री० रवींद्रराव,

      सप्रेम नमस्कार.

      आपले पत्र वाचून खूप खूप आनंद झाला. आपल्यासारख्या मराठीसंस्कृतिप्रेमींची जेव्हा ओळख होते तेव्हा मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या पुनरुत्कर्षाबद्दलची आशा पुन्हा पल्लवित होते. आपले हे पत्र वाचून ज्यांना शक्य त्यांनी आपल्या ह्या उपक्रमात आपल्याला निश्चितपणे मदत करावी.

      आपण म्हणता त्याप्रमाणे कराचीत मोठ्या संख्येने मराठी लोक नोकरीच्याच नव्हे तर धंद्याच्या निमित्तानेसुद्धा गेले होते, असे ऐकलेले आहे. मुंबई इलाख्याचा भाग असल्यामुळे तिथे सरकारी अभिलेख (रेकॉर्ड) मोठ्या प्रमाणात मोडी लिपीतही ठेवला जात होता, असेही ऐकलेले आहे.

      एक कुतूहल वाटते. नारायण जगन्नाथ शाळा ही मराठी माध्यमाचीच शाळा होती का, ह्याबद्दल मात्र निश्चितपणाने आतापावेतो काही समजलेले नाही. आपल्याकडे त्यासंबंधी काही निश्चित माहिती/पुरावा आहे काय? असल्यास अमृतमंथनाच्या वाचकांच्या माहितीसाठी त्याबद्दल माहिती द्यावी, ही विनंती.

      आपल्या ध्येयप्रेरित उपक्रमास लवकर यश लाभावे, अशी आम्ही शुभेच्छा करतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मंगेश भोईर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण इंग्रजी (रोमन) लिपीत लिहिलेले मराठी वाक्य नीटसे स्पष्टपण कळले नाही. कृपया देवनागरी लिपीत मराठी भाषेतील वाक्य लिहिल्यास अमृतमंथनावरील आपल्या सर्वच मराठी वाचक बांधवांना ते समजणे सोपे जाईल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० धैर्यशील कुटे यांसी,

      आपण पाठवलेल्या छायाचित्राबद्दल अत्यंत आभारी आहे. डॉन वर्तमानपत्राने त्या छायाचित्राच्या संबंधात काही लेख प्रकाशित केला होता काय? त्या छायाचित्रासंबंधित अधिक काही माहिती मिळू शकली तर फार बरे होईल.

      आभारी आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. नमस्कार

    कराची च्या संपूर्ण मराठी मंडळी ला माझा नमस्कार ,अभिनंदन ,माझ नाव मिलिंद शेंडे आहे , मी मुंबई ला असतो ,मी एक स्क्रिप्ट राईटर आहे ,माझ एक निवेदन आहे कि कोणी मराठी भाऊ बहिण फेसबुक वर असतील तर त्यांची माहिती द्यावी ,आम्हाला खूप आवडेल धन्यवाद

    • प्रिय श्री० मिलिंद शेंडे यांसी,

      आपल्या आपुलकीच्या पत्राबद्दल आभार. आपले आवाहन अमृतमंथनावर प्रसिद्ध करीत आहोत.

      आपण जगभरातील मराठी माणसांचे धागेदोरे शोधतो. त्यामुळे विशेषतः पाकिस्तानातील कराचीमधील ताटातूट झालेल्या आपल्याच आप्तस्वकीयांचा पुन्हा शोध घेण्याची कल्पना चांगली आहे.

      पत्राबद्दल आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • साहेब आपल्या त्वरित उत्तर करता खूप खूप धन्यवाद , जेव्हा पासून तुमच्या शी संपर्क झाला आहे तेव्हा पासून आपण सर्व भाऊ बहिणींशी भेटायची आतुरता खूपच वाढली आहे , तुम्ही सर्व लोक कशे काय आहात ,आम्ही तुमच्या करता काय करू शकतो ,माझी मनापासून इच्छा आहे कि कराची ला येउन तुमच्या सगळ्यांशी भेट करू अन एक documentary फिल्म चा निर्माण करू अण भारत मध्ये त्याचा प्रदर्शन करू ,माला तुमच्या बद्दल बरच काही जाणून ग्यायचं आहे ,आपण सोशल मिडिया चा पण भरपूर उपयोग करू शकतो , माला अत्ता हेच कळत नाही आहे कि काय लिहू अण काय नाही ,एकदा पुनः तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन ,कधी पण आपल्याला एकट मानू नव्हे ,आम्ही सगळे लोक तुमच्या बरोबर आहे

        तुमचा भाऊ

        मिलिंद शेंडे

        • प्रिय श्री० मिलिंद शेंडे यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या भावना आम्ही समजू शकतो. आपल्या भावना योग्य लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि आपल्याला त्यांच्याकडून लवकरच प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० संदीप पांडे,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपले पत्र इतरांच्या माहितीसाठी प्रकाशित करीत आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अभिजित यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपुलकीने लिहिलेल्या आपल्या पत्राबद्दल आभार.

      पाकिस्तानातील ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ ह्या शाळेतील मुलांबद्दल आपल्याला वाटणारी ममत्व आणि आत्मीयता आपल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. परंतु त्यामागे ‘त्या शाळेतील मुले मराठी माध्यमात शिकतात’ असा आपला समज असल्यास, तो मात्र चुकीचा आहे.

      व्हॉट्‌स्‌ऍपवर अनेक थापेबाजीचे संदेश फिरत असतात. त्याखाली नाव नसल्यामुळे त्यांची कोणीही जबाबदारी घेण्याचा प्रश्नच नसतो. तशाच एका संदेशात ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ ह्या मराठी माध्यमाच्या शाळेतून मुले पाकिस्तानात शालान्त परीक्षा देतात, असा काहीतरी संदेश फिरत होता. तो धादांत खोटा होता. महाजालावर शोध घेतल्यास आपल्याला सहजच लक्षात येईल की त्या शाळेत कधीच मराठी शिकवले जात नव्हते आणि आजचा तर प्रश्नच नाही. त्या शाळेच्या प्रख्यात माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाव कमावले पण कोणाचाही मराठीशी काडीइतकाही संबंध नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात नारायण जगन्नाथ ह्या शिक्षणतज्ज्ञाला सरकारने कराचीमध्ये ती शाळा सुरू करून व्यवस्थित प्रस्थापित करण्यासाठी नेमले होते. त्यांनी ती जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडल्यामुळे स्थानिक सरकारने तेव्हा त्यांच्या नावावरूनच त्या शाळेला नाव दिले असावे, एवढेच मोघमपणे त्या शाळेबद्दल कळलेले आहे.

      महाराष्ट्रातील ७०% मुले आजही मराठी माध्यमात शिकतात. त्यांच्या शाळांकडे सर्व राजकारण्यांनी आणि शासनाने पूर्णतः पाठ फिरवलेली आहे. अशा मराठी शाळांना आणि त्या शाळांतील विद्यार्थ्यांना काही तरी साहाय्य करणे शक्य असल्यास निश्चितच करू शकता. त्यासाठी ती मराठी शाळा पाकिस्तानातच हवी असा आग्रह कशाला धरायचा?

      अमृतमंथन अनुदिनीवर मराठी शिक्षणाबद्दलही बरेच लेख आहेत. त्यांच्यावरूनही नजर फिरवावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. Sorry, I cannot use Marathi font here. My father Laxman Achyut Kelkar was born in Karachi at his maternal uncle’s house. My grand mother, father’s mother, belonged to Lagu family. I am told that he was a teacher in school in Karachi. One of my uncle Vasant Lagu was the founder of V.V.Lagu Travel Consultants in Shivaji Park, Dadar, Mumbai. Unfortunately not one person of that generation is alive today. I would like to more about this Lagu family.

    • प्रिय श्री० अरूण केळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या भावना आम्ही समजू शकतो. अशाच प्रकारच्या भावना व्यक्त करणारी, कराचीबद्दल आणि तेथील मराठी संस्कृतीबद्दल ममत्व व्यक्त करणारी आणखीही काही पत्रे ह्यापूर्वी आलेली आहेत. प्रस्तुत लेखाखाली आपण ती पत्रे वाचू शकता. विशेषतः रवींद्र हरि अभ्यंकर, मिलिंद शेंडे, अभिजित इत्यादी मंडळींची पत्रे अवश्य वाचावीत. इच्छा असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

      आपल्या शोधकार्याच्या यशासाठी आपल्याला शुभेच्छा.

      क०लो०अ०

      -अमृतयात्री गट

  8. लेख छान आहे,अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो कराचीला जी ८ , १० मराठा कुटुंबे सुरवातीला आली त्यापैकीच आमचे एक कुटुंब होय. माझे पणजोबा शिवाजी सावंत हे हे कराची म्युनिसिपालटीत असिस्टंट कलेक्टर चीफ सेक्रेटरी झाले. कालांतराने असिस्टंट कलेक्टरची जागा रिकामी झाली. शेवटी या महत्वाच्या जागेवर माझ्या
    पणजोबांची निवड झाली.पहिली मराठी व्यक्ती. ज्याकाळी शिवाजी छत्रपतींचे नाव घेणे गुन्हा समजाला जाई त्यावेळी माझे पणजोबा व त्यांचे भाऊ यांनी शिवजयंती उत्सव कराचीत सुरु केला व शिवजयंतीच्या दिवशी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पालखीतून वाजत गाजत थाटाची मिरवणूक कराची शहरभर काढण्याची प्रथा पाडली.
    माझ्या आजीचे वडील म्हणजे कराची येथील दुसरे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध कर्ते सुधारक विठ्ठल गणेश उर्फ भाई साहेब प्रधान M.A.L.T .कराचीतील महाराष्ट्रीयांची दुसरी शिक्षण संस्था त्यांनी काढली कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ.या संस्थेमार्फत शिवाजी हायस्कुल. हे शाळा चालवली जात होती.
    माझ्या आजोबांचा जन्म कराचीत झाला व BA पर्यंतचे शिक्षण कराचीत झाले कराचीतील व्हिक्टोरिया ज्युबली सिल्वर मेडल त्यांना मिळाले कराचीत प्रथम आल्याबद्दल. व हायस्कूलच्या ओनर्सच्या बोर्डावर त्यांचे नाव लिहिले गेले. संस्कृतच्या प्राविण्याबद्दलचे हि पारितोषिक मिळाले. इंटर आर्ट्स मध्ये हि त्यांना संस्कृत पारितोषिक मिळाले. कराचीत त्यावेळी law collage नसल्याने LLB च्या अभ्यासासाठी ते मुंबईला आले व Government law school मधून law पास झाले
    जितेश सावंत .

  9. नमस्कार. मी अरविंद व्यं. गोखले. माझा उल्लेख वरील अमृतमंथनातून आला असल्याने हा पत्रप्रपंच. मी पाकिस्तानात पाचवेळा जाऊन आलो आहे आणि पाकिस्तानवर माझी काही पुस्तकेही आहेत. कोणाला आणखी काही माहिती हवी असल्यास माझ्या इमेल वर संपर्क साधू शकता.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.