बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष (सुधारित लेख-२२.०५.२०१०)

ग्राहकांना सक्षम व पारदर्शी पद्धतीने सेवा पुरविण्याच्या दृष्टीने इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे बँकांनीसुद्धा स्थानिक भाषा, संस्कृती, रीतिरिवाज इत्यादींचा अभ्यास करून लोकांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शनपर तत्त्वांची अंमलबजावणी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होत असते आणि विशेषत: महाराष्ट्रात स्थानिक भाषेविषयीच्या नियमांची अंमलबजावणी फारशा गंभीरपणे केलेली आढळत नाही.

अशा परिस्थितीत इतर भारतीय राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही बॅंकांनी सर्व भाषाविषयक कायदेशीर तरतुदींचे पालन करावे यासाठी आपण काय करू शकतो? केवळ केंद्रसरकार, राज्यशासन, रिझर्व्ह बॅंक इत्यादी संस्थांवर अवलंबून राहून यात फारसा काही फरक पडेल असे वाटत नाही. सामान्य जनतेनेच आपले औदासिन्य आणि मरगळ झटकून टाकून सर्व बॅंकांना तसेच सर्व कायदेशीर यंत्रणांना कायद्याचे शब्दश: व भावार्थशः (in letter and spirit) पालन करण्यास भाग पाडले पाहिजे. आपल्याला हे सर्व कायदेशीर मार्गाने साध्य करून घ्यायचे असेल तर त्यासाठी प्रथम बॅंकिंग क्षेत्रातील भाषांच्या संबंधातील सर्व कायदे, त्यांच्या मागील उद्दिष्टांसह व प्रयोजनांसह, आपण नीट समजून घेतले पाहिजेत, त्यामधील स्थानिक भाषेचे अधिकार आपण व्यवस्थितपणे जाणून घेतले पाहिजे आणि ते आपण दुसर्‍यांना पटवून देऊ शकलो पाहिजे.

प्रस्तुत लेखात बॅंकांनी स्थानिक भाषेचा उपयोग करण्यासंबंधीच्या कायद्यांबद्दल सप्रमाण चर्चा केली असल्यामुळे या लेखाचा आपल्या मित्रमंडळीत जास्तीत जास्त प्रसार करावा ही नम्र विनंती. ह्या लेखाच्या छापील/महाजालावरील प्रती आपण मित्रांना उपलब्ध करून द्याव्यात. लेखातील कायदेशीर संदर्भांचा उपयोग करून आपापल्या बॅंकांना भाषाविषयक कायद्यांचे पालन करण्यास लावणे हे आता आपल्याच हातात आहे.

—————–

बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष

– ले० सलील कुळकर्णी

प्रास्ताविक

गेल्या काही वर्षांत भारतामध्ये बॅकींग क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. बॅंका पुरवीत असलेल्या विविध सुविधा आणि योजनांच्यामुळे त्यांचा देशाच्या विविध प्रदेशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अशा कोट्यवधी ग्राहकांशी संबंध येत असतो. आज केवळ नागरी भागातच नव्हे तर इतर उपनागरी व ग्रामीण भागातही बॅंकांचा ग्राहक मोठ्या प्रमाणात पसरला आहे. ग्राहकांना सक्षम व पारदर्शी पद्धतीने सेवा पुरविण्याच्या दृष्टीने इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे बँकांनीसुद्धा स्थानिक भाषा, संस्कृती, रीतिरिवाज इत्यादींचा अभ्यास करून लोकांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच हेतूने भारताची राज्यघटना, भाषाविषयक धोरण आणि त्यासंबंधातील विविध कायदे यांच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक वेळोवेळी सर्व अनुसूचित (शेड्यूल्ड) बॅंकांना मार्गदर्शनपर सूचना देत असते. परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शनपर तत्त्वांची अंमलबजावणी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होत असते आणि विशेषत: महाराष्ट्रात स्थानिक भाषेविषयीच्या नियमांची अंमलबजावणी फारशा गंभीरपणे केलेली आढळत नाही. अर्थात अशाच प्रकारच्या इतर कायद्यांप्रमाणे याबाबतीतही महाराष्ट्र राज्य शासनाचा अनुत्साह आणि सामान्य मराठीजनांचे औदासिन्य व निरभिमान हेच गुण (?) ह्याला मुख्यत: कारणीभूत आहेत.

आता अशा परिस्थितीत इतर भारतीय राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही बॅंकांनी सर्व भाषाविषयक कायदेशीर तरतुदींचे पालन करावे यासाठी आपण काय करू शकतो? केवळ केंद्रसरकार, राज्यशासन, रिझर्व्ह बॅंक इत्यादी संस्थांवर अवलंबून राहून यात फारसा काही फरक पडेल असे वाटत नाही. सामान्य जनतेनेच आपले औदासिन्य आणि मरगळ झटकून टाकून सर्व बॅंकांना तसेच सर्व कायदेशीर यंत्रणांना कायद्याचे शब्दश: व भावार्थशः (in letter and spirit) पालन करण्यास भाग पाडले पाहिजे. आपल्याला हे सर्व सनदशीर मार्गाने साध्य करून घ्यायचे असेल तर त्यासाठी प्रथम बॅंकिंग क्षेत्रातील भाषांच्या संबंधातील सर्व कायदे, त्यांच्या मागील उद्दिष्टांसह व प्रयोजनांसह, आपण नीट समजून घेतले पाहिजेत, त्यामधील स्थानिक भाषेचे अधिकार आपण व्यवस्थितपणे जाणून घेतले पाहिजे आणि ते आपण दुसर्‍यांना पटवून देऊ शकलो पाहिजे.

बॅंकिंग क्षेत्रातील भाषाविषयक कायदे समजून घेण्याआधी प्रथम आपण भारताची राज्यघटना आणि इतर विविध कायदे यांच्याद्वारे निश्चित केलेले भाषाविषयक धोरण ह्यांची पार्श्वभूमी थोडक्यात तपासून पाहू आणि मग त्यावर आधारित असलेले रिझर्व्ह बॅंकेचे नियम व मार्गदर्शक सूचना आपण पडताळून पाहू.

 

भारताच्या राज्यघटनेवर आधारित सर्वसामान्य भाषिक धोरण

१.     भारताच्या राज्यघटनेने हिंदी किंवा इतर कुठलीही भाषा `’राष्ट्रभाषा’ म्हणून घोषित केलेली नाही. म्हणजेच भारताला कुठलीही एक `राष्ट्रभाषा नाही.

२.     राष्ट्रभाषेची स्पष्ट व्याख्या करण्याच्या ऐवजी राज्यघटनेने आठव्या परिशिष्टात देशातील महत्त्वाच्या भाषांची यादी दिलेली आहे. यामध्ये देशातील सर्व राज्यांच्या प्रमुख भाषांचा समावेश आहे. देशाला एक राष्ट्रभाषा नसली तरीही घटनेच्या आठव्या परिशिष्टात नमूद केलेल्या सर्वच भाषा राष्ट्रभाषेच्या समतुल्य समजल्या जाव्यात असा संकेत मानला जातो.

३.     केंद्रसरकारच्या देशभर पसरलेल्या विविध कार्यालयामधील अंतर्गत संवादामध्ये व व्यवहारामध्ये सुसूत्रता असावी यादृष्टीने केंद्रसरकारच्या अंतर्गत व्यवहारांसाठी हिंदी आणि त्याचबरोबर इंग्रजी या अधिकृत भाषा म्हणून ठरवल्या गेल्या आहेत. इथे अधिकृत भाषा (ऑफिशियल लॅंग्वेज) या शब्दाचा अर्थ केंद्रसरकारची कार्यालयीन (ऑफिसच्या) कामकाजाची भाषा एवढाच मर्यादित आहे आणि जनतेशी संबंधित अशा इतर कुठल्याही दृष्टीने या दोन भाषांना इतर घटनामान्य भाषांपेक्षा अधिक अधिकार नाहीत. (विशेषतः इंग्रजी भाषेचे स्थान तर देशाच्या जनतेच्या संदर्भात इतर घटनामान्य भारतीय भाषांपेक्षा गौणच आहे.)

४.     केंद्रसरकारची कार्यालये संपूर्ण देशभर विविध राज्यांमध्ये पसरलेली आहेत. तेथील जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारने आपले विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व महामंडळे यांना त्रिभाषासूत्र लागू केले आहे. या सूत्रानुसार जनतेशी संज्ञापन (संवाद) साधण्यासाठी त्या-त्या ठिकाणच्या अधिकृत स्थानिक भाषेला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असून त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर हिंदी व तिसर्‍या क्रमांकावर इंग्रजी भाषेला स्थान दिले गेले आहे. याचाच अर्थ असा की केंद्रसरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसारसुद्धा कुठल्याही राज्यात त्या राज्याची स्थानिक राज्यभाषा हीच सर्वाधिक महत्त्वाची भाषा असून केंद्रसरकारच्या अधिकार्‍यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यत: आणि सर्वाधिक प्राधान्याने त्याच भाषेचा उपयोग केला पाहिजे. हिंदी व इंग्रजी या भाषांचे स्थान महत्त्व व प्राधान्य या दृष्टींनी स्थानिक राज्यभाषेच्या नंतरच आहे.

५.     घटनाकारांनी प्रत्येक राज्याला आपापल्या राज्यकारभारासाठी योग्य ती अधिकृत भाषा (राज्यभाषा) निवडण्याचा हक्क दिला. राज्यपातळीवर अधिकृतपणे निवडलेली राज्यभाषा ही केवळ राज्यशासनाच्या अंतर्गत व्यवहारासाठीच नसून राज्यात सामान्यजनांशी संवाद साधण्यासाठी सुद्धा तीच भाषा वापरणे अपेक्षित आहे.

६.     लोकशाहीची व्याख्याच मुळात लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे चालविलेली शासनव्यवस्था अशी आहे. अशी शासनव्यवस्था जर राज्यातील बहुजनांना समजेल अशा त्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि स्वतःच्या संस्कृतीशी निगडितच नसेल तर लोकशाहीच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासला जातो. लोकशाहीत सामान्य नागरिकाला आपल्या अधिकृत स्थानिक भाषेमधून सर्व दैनंदिन व सामान्य नागरी व्यवहार सुलभतेने करता यायलाच पाहिजेत आणि त्यासाठी त्याला परराज्यातील किंवा परदेशातील भाषेवर अवलंबून रहायला लागणे हे लोकशाहीच्या मूलतत्त्वांना काळिमा फासणारे ठरेल. हे तत्त्व भारताची राज्यघटना व त्यावर आधारित विविध कायद्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते आणि हेच तत्त्व बहुतेक सर्वच राज्यात पाळले जाते.

७.     वरील सर्वमान्य तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या अनेक निवाड्यांमध्ये स्पष्टपणे मांडली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणात मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धचा रिट अर्ज फेटाळून लावताना महात्मा गांधींच्या मताचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. “आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजिवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडे पडणे) होते व तसे घडणे ही भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत निंद्य गोष्ट आहे.’’

वरील सर्व विवेचनावरून भारताच्या भाषिक धोरणामागील एक तत्त्व सुस्पष्ट होते ते म्हणजे राज्याच्या अधिकृत भाषेला सर्वाधिक महत्त्व देणे आणि तीच भाषा मुख्यत: आणि प्राधान्याने राज्यात सर्वत्र माहिती/संज्ञापनासाठी वापरणे हे तत्त्व बेकायदेशीर किंवा अनैतिक तर नाहीच उलटपक्षी ते देशाच्या घटनेच्या भाषाविषयक मूळ संकल्पनांना आणि उद्दिष्टांना धरूनच आहे.

रिझर्व बॅंकेचे अनुसूचित बॅंकांसाठी भाषाविषयक नियम व मार्गदर्शक तत्त्वे

वरील सर्व कायदेशीर पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता आपण बँकिंग क्षेत्राला लागू असणार्‍या भाषाविषयक नियमांचा विचार करु. रिझर्व्ह बँक वेळोवेळी ग्राहकसेवा व भाषिक धोरण यांच्यासंबंधी विविध मार्गदर्शक तत्त्वे व नियम सूचित करीत असते. याविषयी विविध परिपत्रकांद्वारे पूर्वी दिलेल्या अशा प्रकारच्या सूचना एकत्र करून सर्व अनुसूचित बँकांना उद्देशून जारी केलेले [क्र. RBI/2008-09/261 (DBOD. No. Leg.BC. 75/09.07.005/2008-09) दि. ३ नोव्हेंबर २००८] हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचे आहे. या परिपत्रकातील काही महत्त्वाच्या तरतूदी खाली दिल्या आहेत. तसेच आवश्यक तिथे काही तरतूदींच्या खाली स्पष्टीकरणात्मक टीप किंवा भाष्य दिलेले आहे.

रिझर्व बॅंकेने ठरवलेले पुढील भाषाविषयक नियम पाहिले तर असे लक्षात येते की एखाद्या राज्यातील सामान्य जनतेशी राज्याच्या स्थानिक भाषेत विविध प्रकारे संवाद साधण्यासाठी, माहिती देण्यासाठी व ग्राहकांच्या तक्रारींचे योग्यप्रकारे व शीघ्र निवारण करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. पण महाराष्ट्रात त्यांचे बव्हंशी समाधानकारकरीत्या (शब्दशः व भावार्थशः) पालन होत नाही असे दिसून येते. अशा सर्व बाबतीत राज्यशासन किंवा केंद्रसरकारवर अवलंबून राहणे व्यर्थ असल्यामुळे आपण सामान्यजनांनीच कर्तव्यभावनेने बॅंकांकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे (अगदी रिझर्व बॅंकेच्या ह्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांकासह संदर्भ देऊन) व तरीही योग्य कृती न झाल्यास रिझर्व बॅंकेचा दरवाजा ठोठावून आपल्या तक्रारींची दाद मागणे अशा मार्गाने आपण बॅंकांना महाराष्ट्रात भाषाविषयक कायद्यांचे पालन करण्यास भाग पाडू शकतो. रिझर्व बॅंकेला शक्यतो न दुखावण्याची काळजी सर्वच बॅंका घेतात कारण नियमांचे योग्य पालन न करणार्‍या बॅंकांना शासन करण्याचे अधिकार रिझर्व बॅंकेला आहेत.

———————

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष_100522

.

आपले प्रतिमत (feedback) ह्या लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क० प्रस्तुत लेखाचे लेखक श्री० सलील कुळकर्णी ह्यांना बॅंकिंगक्षेत्रातील भाषाविषयक कायद्यांची माहिती मिळवण्याची इच्छा होण्यास पन्हाळगडावरील यूनियन बॅंकेमधील ज्या अनुभवाचे निमित्त झाले त्याबद्दलचा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगती – स्वाभिमान ते निरभिमान

.

ह्याच विषयावरील काही लेख :

आपल्या बॅंकेचे मूल्यांकन करून बॅंकेला जाब विचारण्यासाठी प्रश्नावली  –}}  https://wp.me/pzBjo-mV

.

Tags : ,,

.

21 thoughts on “बॅंकिंग क्षेत्रामधील भाषाविषयक धोरणाकडे महाराष्ट्रात पूर्ण दुर्लक्ष (सुधारित लेख-२२.०५.२०१०)

    • श्री० सतीश भोसले यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे शंभर टक्के योग्य आहे. इतर देशात, किंबहूना भारतातील इतर राज्यांतही बर्‍याच प्रमाणात तसेच घडत असते. महाराष्ट्रातील जनतेला व शासनाला स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा असे का वाटते हेच समजत नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. a few months back i read a board in central bank, goreaon west, saying that “SABHI PATRACHAAR HINDI MAINHI KARE. HINDI HAMAARI RAASHTRABHAASHAA HAI.”

    i read a board at mtnl,goregaon west saying that”ALL THE KEYBOARDS OF COMPUTERS HAVE BEEN CHANGED TO HINDI SCRIPT ..PL NOTE THAT NO OTHER KEYBOARDS WILL BE ENTERTAINED”.
    state bank observes HINDI PAKHAWAADA.every year a certain no. of letters are to be written compulsurily in hindi,otherwise br.manager has to give explaination.

    I donot know how to write in marathi on this link, therefore i have written this in english.

    • प्रिय श्रीमती रुता चित्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले निरीक्षण व त्याबद्दलची प्रतिक्रिया, उद्वेगाची भावना हे सर्व साहजिक व योग्यच आहे. पण आपण मराठी माणसे तेवढ्यावरच थांबतो व आपापल्या कामाला लागतो. पण इतर राज्यांत ह्याची प्रतिक्रिया अधिक स्पष्ट व जहाल होऊ शकते.

      आपण निदान अधिकृतपणे पत्र लिहून (राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या बाबतीत शक्यतो माहिती अधिकाराखाली) त्यांना हिंदी राष्ट्रभाषा असण्याबद्दलचे घटनेतील किंवा देशातील इतर कुठल्याही कायद्याचा संदर्भ मागावा व त्या पत्राची प्रत मुद्दाम रिझर्व बॅंकेलाही पाठवावी. रिझर्व बॅंकेला सर्वच बॅंका थोड्याफार तरी घाबरतात.

      आपल्याला पत्राचा खर्डा (ड्राफ्ट) बनविण्यास सहाय्य पाहिजे असल्यास amrutyatri@gmail.com ह्या विपत्त्यावर पत्र धाडावे. आम्ही सर्वतोपरी मदत करूच.

      या विषयाबद्दल व संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल श्री० पराग सुतार ह्यांना (https://amrutmanthan.wordpress.com/2009/09/18/पन्हाळा-एक-अनुभव-मराठी-मा/) ह्या लेखाखाली लिहिलेले पत्रोत्तर कृपया पहावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. मराठी माणसा आता तरी जागा हो. मराठी बोलण्याची सवय आपण सर्वानीच लाउन घेतली पाहिजे.
    हल्ली हॉटेलमधे गेले की किवा रिक्षावाल्यांशी पुण्यातील लोकनाही हिंदी बोलण्याचा रोग जडला आहे.
    बर या हिंदी प्रेमींना असे करू नका हे सांगायला गेले तर हेच आपल्याला ‘हल्लीचा जमाना असाच आहे. मराठीला कोण विचारते आता?’ असा उलट प्रश्न विचारतात.
    हल्लीच्या आधुनिक आई बापांचा (माफ करा मम्मी डॅडचा) त्यांची पोर मराठी बोलली की संताप होतो. त्यांच पोर कुत्र्याला पाहून ‘भूभू’ म्हटले तर त्या कुत्र्यापेक्षा यानाच जास्त लाज वाटते. त्यांच्या मते त्यांच्या बाळाने त्या प्राण्याला ‘डॉगी’ म्हणणे अपेक्षित असते. कारण त्यांचे ते बाळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणार असते. त्याना मराठी माध्यमाच्या शाळेचीदेखील लाज वाटत असते. परदेशी नागरिकांचा आणि त्यांच्या देशाचा मनापासून स्वीकार केलेले हे लोक त्याच्याकडून नको तेच गुण जास्त उचलतात. परदेशी लोक त्यांच्या मातृभाषेतच त्यांच्या मूलाना शिक्षण देतात, अगदी जर्मनसारख्या देशातही ते लोक शिक्षण हे जर्मन भाषेताच घेतात. मग परदेशी लोकांचे पदोपदी अनुकरण करणारे हे लोक त्यांचा हा गुणही का घेत नाहीत ते त्यांचे त्यानाच माहीत. आता या मुद्द्याचे उत्तर हे ‘इंग्रजी मध्यम’ प्रेमी लोक असे देतील की मराठी शाळेत कुठे इंग्रजी नीट शिकवले जाते? पण आता मराठी शाळेनेही इंग्रजी अभ्यासक्रमात, मुलं जास्तीत जास्त इंग्रजी कशी बोलतील यावर भर दिला आहे. पण खोट्या प्रतिस्थेला बळी पडून ही लोक मराठी शाळेलासुद्धा हीन मानतात. हे प्रकार मुंबईप्रमाणेच पुण्यातही जोरात चालू आहेत. जर का पुढील पिढीला मातृभाषेतून शिक्षण मिळाले तरच त्याना आपल्या भाषेच आणि संस्कृतीचा अभिमान वाटेल.

    मला इथे शिवाजी महाराजांच्या जीवानातला एक प्रसंग सांगावा असे वाटते. राजांनी जेव्हा राज्याकारभारासाठी स्वतःचे शिक्के बनवायला सांगितले तेव्हा ते संस्कृत भाषेतूनच असले पाहिजेत असे हाताखालच्या अधिकार्‍याना सांगितले. अशिकारी म्हणाले की महाराज आतापर्यंत आपण उर्दू भाषेतले शिक्के वापरले मग आता हा बदल का? त्यावर राजे म्हणाले की, “पंत राज्य आपले आहे मग शिक्केपण आपल्या भाषेतूनच आसले पाहिजेत. एक लक्षात ठेवा पंत जेव्हा आपण दुसर्‍याची वस्तू किवा भाषा सारखी सारखी वापरतो ना तेव्हा आपल्याला आपल्याच वस्तुची किवा भाषेची एक ना एक दिवस लाज वाटायला लागते.”

    मला असे वाटते की राजांचे हे वाक्य बरेच काही सांगून जाते. आज चार शतकानन्तर राजांचे विचार खरे ठरले आहेत आणि हिंदी आणि इंग्रजीच्या अती वापरांमुळेच आपल्याला मराठीची आणि मराठी शाळांची लाज वाटते.

    पण आपल्या हातून झालेली ही चुक आपण सर्व मराठी लोक नक्कीच सुधारू आणि मराठीचा आणि मराठी शाळांचासुद्धा स्वीकार करू आणि हे करताना आपण मनातून कोणताही न्यूनगंड बाळगणार नाही असे मला वाटते.

    वरील सर्व परिच्छेद मज्जा म्हणून वाचला नसेल तर तुमची त्याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
    तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.

    इंग्रजी माध्यमाकडे आकर्षित झालेल्या लोकांना परत मराठी माध्यमाकडे आकर्षित करण्यासाठी आणि मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्या मनात काही उपाय आसतील तर ते आवश्य कळवा.

    • प्रिय श्री० तुषार येळवे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण अगदी आम्हा सर्वांच्या मनातलेच बोललात. ह्यावर अधिक प्रतिक्रिया काय देणार?

      अमृतमंथनावरील विविध लेखांत तसेच वेळोवेळी विविध वाचकांच्या पत्रांना उत्तरे देताना आम्ही अशाच प्रकारची विधाने केली आहेत व आपली मते मांडली आहेत. आपल्या पत्रांमुळे बरे वातले, जोम वाटला, उत्साह निर्माण झाला.

      सध्याच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सतराव्या शतकातील इंग्लंड, गेल्या शंभर वर्षातील जपान व गेल्या काही दशकातील चीन, कोरिया, इस्रायल असे स्वाभिमानी देश, ह्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला काही जमेल तर प्रयत्न करावा. इतरांना उद्युक्त करावे. यशाची कोण खात्री देणार?

      आपल्या उत्तम पत्राबद्दल आभार. शिवाजी महाराजांचे उदाहरण स्फूर्तिदायक आहे. असेच लिहित जावे. आपल्या आशावादाची, हुरूपाची लागण इतरांनाही होऊ दे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० हर्षद करंदीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. सर्व मराठीप्रेमींना वेळोवेळी प्रत्यक्षात एका जागी जमवणे व कृतियोजना करून तिच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणे हे आपल्यासारख्या सामान्यांना कठीण आहे. म्हणूनच तर मराठी एकजूट सारखा अनौपचारिक गट स्थापन केला आहे. त्यांनी ह्याचा आपल्या इतर मित्रमंडळीत प्रसार करावा. प्रस्तुत लेखात केलेल्या विनंतीवजा आवाहनाप्रमाणे जर प्रत्येक मराठीप्रेमीने आपापल्या बॅंकांच्या मागे हात धुवून लागायचे ठरवले व प्रत्येक बॅंकेला शेकडो, हजारो पत्रे मिळाली तर त्यांना त्याची गंभीर नोंद घेऊन सुधारणा करायलाच लागेल.

      आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरूवात करू व आपल्या मित्रांनाही तसेच करण्यास उद्युक्त करू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • BHAARTEEY RAILWAY CHYAA ,RAIL BHAVAN HYAA DILLITEEL MUKHYALAAT MAMATAA BAANARJEENAA,
        Nana Shankarsheth Rail Bhavan ase patra, aanee Naanaa Shankarsheth Rail Sangrahaalay,CHANAKYPUREE Dilli 110021,Ahyaa mathalyaane patra naa pathwoon,Grant road aiwaajee Naanaan che naav tyaa jaagaanaa denyaa saathee,POST CARD pathwoo shaklaat tar ek naveen survaat hoil,
        NAANAAN CHE NAAV JAGAALAA KALAAVE HAA HETU,
        GHARAAWAR NILEE PAATEE LAWOON SMAARAKE BANAWNE SODAA,Waadalaa chyaa dolyaat ghusaa.
        Jay Maharashtra maate,
        Jay Bharat Jananee.

        • प्रिय श्री० माध्व यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपले पत्र सर्व वाचकांच्या वाचनासाठी प्रसिद्ध केले आहे.

          बोरीबंदराचे पुनर्नामकरण करताना तशी सूचना आली होती. पण कॉंग्रेसला अर्वाचीन काळातील मराठी पुढार्‍यांचे वावडे असल्यामुळे व शिवाजी महाराज वगळता दुसरा कोणीही थोर मराठी माणूस होऊनच गेला नाही अशी त्यांची समजूत असल्यामुळे तेव्हा कलमाडी हे मध्येच कडमडले आणि त्यांनी बोरीबंदरचे ’छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (महास्थानक) असे नामकरण केले.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  3. Jevaa Ahankaaraalaa, Ghamendilaa Saabhimaan samazle jaate,tevaa tevaa asech honaar, kaaheehee upaay naahee,Sheevaay grahak peth,graahak manch,je Loksattaa madhe laamb laamb lekh liheetaat,te Loksattaa madhe pratikriyaa takaa ase sangtaat,Loksaataavaale comments kadhee ch takat naaheet,
    mag he Gujrathee adhyaksh,aplaa mobile number kashalaa detaat,
    FAKTA VYAAVSAAIK BAKRE SHODHNYAA SAATHEE?
    Loksatta che jawal jawal sarva lekhak hyaach dhandyaat aahet.
    Ashaa steeteet bakinaa nantaat,AMCHYAACH SURUNG LAVNAARYAA ASHAA LOKAAVAR VAACHAK HALLAA TYAANEE SHARAN YEISTAVAR ZAALAA PAHEEJE,
    PRASAAR MAADHYAME FAKT TRP CHEE SHIKAAREE AAHET,TYAANCHEE SHIKAR PRATHAM.
    MEE MAAZYAA VICHAARAAVAR THAAM AAHE,ANEE SHAABDIK HALLA SURU KELAA AAHE,
    PAN EKAANE SUDDHAA AJUN,CHAVTAALUN PRATI HALLA KELAA NAAHEE.
    HYANCHE PEKSHAA, Maharani Tarabai,Chadbeebee,madhe shauryaa jaast hote,
    Media Queen’s Kings,ekaa mail madhech INTERNET TEERTHEE kosaltaat.
    JAY MAHARASHTRA MATE, JAY BHARAT JANANEE.

  4. a few months back, i went to ATM of indian bank at ashoka shopping center, near patkar college,s.v. rd. i found that the machine was showing information only in tamil. i went to a branch office upstairs and asked about it. officer came with me and translated it in english but couldnot in hindi.he agreed that this was a wrong practice and should be changed.i suggest that amrutyatri should prepare a common prashnawali for all the banks regardless of their particular branch office and let us know the e-mail adresses of all the public/private banks so that we all can make their life miserable by sending this questionair to them again and again till they answer us.

    • प्रिय श्रीमती रुता चित्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण एक महत्त्वाची बाब लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. हे असे दयनीय दृश्य फक्त महाराष्ट्रातच आढळेल. महाराष्ट्र बॅंकेच्या तमिळनाडूमधील एटीएममध्ये केवळ मराठीतून सूचना आहेत, अशी आपण स्वप्नात तरी कल्पना करू शकतो काय? (खरं म्हणजे महाराष्ट्र बॅंकेचे मुख्यालय पुण्यात असले तरीही त्या बॅंकेच्या पुण्यातील एटीएम केंद्रात केवळ हिंदी व मराठी भाषेतच सूचना आहेत, हे लक्षात घ्यावे. केंद्र सरकारचे व रिझर्व बॅंकेचे नियम असूनही स्वतः महाराष्ट्र बॅंकसुद्धा मराठीचा मान ठेवत नाहीत; तर इतर कशाला ठेवणार?)

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/06/01/आपल्या-बॅंकेचे-मूल्यांकन/

      वरील लेखामध्ये अनुसूचित व्यावसायिक बॅंकांची (Scheduled Commercial Banks) यादी दिलेली आहे. त्या प्रमाणे इंडियन बॅंक ही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक आहे. म्हणजे तिला रोझर्व बॅंकेचे नियम तसेच केंद्र सरकारचे त्रिभाषासूत्र हे दोन्ही लागू आहेत. आपण माहितीच्या अधिकाराखाली प्रस्तुत बॅंकेला जाब विचारावा अशी कळकळीची विनंती. आपण आपल्या दैनंदिन व्यापातून थोडा वेळ काढून एवढे आपल्या मायबोलीसाठी करू शकलात तर खरोखरीच चांगले होईल.

      वरील लेखातील ’सार्वजनिक क्षेत्रांतील बॅंकांना माहिती अधिकाराखाली लिहिण्याच्या पत्रांचा नमुना’ आपण वापरू शकता. तो सर्वच सार्वजनिक क्षेत्रांतील बॅंकांना लागू आहे. खासगी क्षेत्रातील बॅंकांसाठी वेगळा नमुनाही दिलेला आहे. कृपया त्यांचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. आपण सुचवल्याप्रमाणे अशा बॅंकांवर आपण पत्रांचा भडिमार सुरू केला पाहिजे.

      आपल्या या महत्त्वाच्या पत्राबद्दल अतिशय आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. I have had similar experience like Rucha. I had been to State Bank Of Hyderabad ATM located at Marve Road Malad ( West ) Branch Mumbai. I observed that option for operating ATM were in 3 languages i. e. English Hindi and Telugu instead of first 2 languages and Marathi.This ia clear-cut violation of 3 languages formula. As the Branch Manager was not available I met the concerned officer and lodged the protest.He informed me that ATMs are installed by their Local Head Office and softwere is provided by them. He expressed his inability to do anythig about it. I told him to take the matter with L. H. O. and I would do the same.
    I have already written to their L. H. O. at Hyderbad and Reserve Bank Of India. I request readers to shoot protest letters to them.
    As I have written many times in Amrutyatri in reply to various articales malady goes deeper than SWABHMANSHUNYATA of Marathis.
    Shrikant Pundlik

    • प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे योग्यच आहे. शेवटी दोष मूलतः आपलाच आहे. अशा बाबी एकतर आपण दुर्लक्षित करतो किंवा केवळ तोडी चर्चा करून विसरून जातो. आपण प्रत्यक्ष कृती केलीत हे उत्तम झाले.

      आंध्र बॅंक ही सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र सरकारची बॅंक असल्यामुळे आपण जर आपले म्हणणे माहिती अधिकाराखाली दिलेत तर ते अधिक परिणामकारक व कालबद्ध ठरेल. खालील दुव्यावरील लेखात दिलेल्या नमुन्याची छापील प्रत वापरून आपण दहा मिनिटांत पत्र तयार करू शकता.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. I refer to my response dated 19th July wherein I had advised regarding option of Telugu language for operating ATM located at Malad (West) branch of State Bank of Hyderabad. I had written to them requesting use of Marathi language as per tri-language formula. Today I had been to the ATM and found Telugu option changed to Marathi. It helped a lot that some political parties including Ashoksingh Chauhan suddenly awoke from their slumber and started agitating for Marathi in the Banks.I also feel sad not only because I have a few Telugu friends but also I believe South Indian culture including Kannada has much more affinity with Marathi than what slaves of Hindi belt and Gujarat believe.We are coward enough to target Telugus and Kannadas who are living peacefully in Maharashtra and fully assimilated with. We are also coward to target Banks which are bound by laws.But for a few crumbs sell Maharashtra to Non-Marathi builders who do not allow those Marathi who can afford-there are very few- to purchase flatsin their colonies.” MUMBAIT GHATI NAI PAIJE” “TUM MARATHI HO KUCH NAHI KAR SAKATE”
    Shrikant Pundlik

    • प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे पटते. हिंदी भाषकांना आपली भाषा ही राष्ट्रभाषा आहे अशा गैरसमजामुळे माज आलेला असतो. अर्थात तो माज महाराष्ट्रातच अधिक चालतो, इतर राज्यांत फारसा नाही.

      आपला आपल्याच राज्यात दरारा नाही, बाहेरचे पाहुणे आमच्या घरात येऊन आम्हा मालकांनाच तुच्छतेने संबोधतात, आमचे नेते पैशासाठी आईबापांनाही विकतील, आम्हाला आमच्याच भाषेबद्दल न्यूनगंड वाटतो, आम्ही मराठी या मुद्द्यावर एकत्र येऊन इतरांच्या अन्यायाला चोख उत्तर देत नाही, आपापसात एकी करून एकमेकांच्या मदतीला धावून जात नाही….

      अशा सर्व गोष्टींना कोण जबाबदार? आपणच ना?

      वेळ आल्यावर बिहारमध्ये नीतीशकुमार, पासवान व लालू असे जन्मजात हाडवैरीही महाराष्ट्राच्या विरुद्ध एकत्र उभे ठाकतात व त्यांना आपण मात्र एकत्रितपणे तोंड देत नाही.

      म्हणूनच म्हटले आहे, मराठी माणसाच्या सर्व प्रश्नांवर “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !!”

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      लेख वाचला का?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट