मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.
सौ० शुभदा रानडे-पटवर्धन
………
.
नीलची शाळा
लेखक: ए० एस० नील
राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये
एक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. ‘आज्ञाधारकता’ हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकडे कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो ‘शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त’ असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.
शाळा आणि शिक्षकांबद्दल विचार करावा तेवढा थोडाच आहे. सेल्बीनं लिहिलेल्या ‘लास्ट एक्झिट टू ब्रुकलिन’चाच विचार करा. ब्रिटनमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. ही बंदी म्हणजे अडाणी कर्मठांच्या सरकारी बोगस बडेजावाचा एक शुध्द नमुना होता. असभ्य शब्द, लैंगिक विकृती, मानवतेची अधोगती या पुस्तकात ठासून भरलेली असूनही, आपल्या तद्दन बढाईखोर संस्कृतीचा एक पैलू त्यात दिसतो, म्हणून सर्वांनी हे वाचायला हवं. हे पुस्तक आपल्याला हादरवून सोडतं. या पुस्तकातून अमेरिकेच्या जीवनविन्मुख आणि दिखाऊ, चकचकीत बाजारू जीवनाची दुसरी बाजू आपल्याला दिसते. व्यापारी-व्यावसायिकांकडून होणारी पिळवणूक, झोपडपट्टीतलं आयुष्य आणि वाईट शिक्षणानं माणसाची काय हालत होते, याचंही चित्रण पुस्तकात आहे. कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती जगातल्या प्रत्येक शहरात आढळते.
मी अजून चाचपडतो आहे. माणूस इतक्या वाईट गोष्टी का करतो हे मी समजावून घ्यायचा असफल प्रयत्न करतो आहे. दुष्टपणा उपजत असतो, कुणी मुळापासून वाईट असतो, यावर माझा विश्वास नाही. समाजानं ओवाळून टाकलेल्या मुलांमध्येही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि मोठ्यांकडून शाबासकीची थाप मिळाल्यानंतर चांगले बदल झालेले मी पाहिले आहेत. पण मग मुद्दलात चांगला असा हा मानवसमाज रोगी, अन्याय्य आणि क्रूर जग निर्माण करतोच का? माझा स्वत:लाच असा सवाल आहे की द्वेष, क्रौर्य, युध्द, आणि विघातक विचारांपासून दूर अशी माणसं जर ‘समरहिल’मधून निर्माण होत शकतात, तर अशी माणसं निर्माण करणार्या शाळा सार्या जगातच का नाहीत?
………………………………………………………………………….
प्रिय रसिकांनो,
मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.
मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,
शुभदा रानडे-पटवर्धन
uttam !!
प्रिय विशाल,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. इतर लेखही वाचून पहावेत आणि त्याबद्दलही अभिप्राय अवश्य कळवावेत. न रुचलेल्या मुद्द्यांबद्दलही लिहायला हरकत नाही.